मागील काही वर्षांच्या तुलनेत आताचे जागतिक तापमान २⁰C ने वाढल्याचे आपल्याला दिसून येते आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे वातावरणात असलेले कार्बनचे प्रमाण आहे. आताच्या घडीला आपल्याभोवती असणाऱ्या वातावरणात जवळपास ७५० दशलक्ष टन एवढा कार्बन आहे आणि जवळपास १५०० दशलक्ष कार्बन हा पृथ्वीच्या भूभागात म्हणजेच मातीमध्ये आहे. आणि मातीचे गैरव्यवस्थापन, रासायनिक खतांचा अतिवापर यासारख्या मानवी क्रियाकलाप हळूहळू हा कार्बन वातावरणात उत्सर्जित करत आहे. ज्याने ७५० दशलक्ष टन असलेल्या हवेतील कार्बनमध्ये अधिक भर पडत आहे. वातावरणातील कार्बनची संख्या जितकी जास्त, तितकी जास्त हानी जीवश्रुष्टीची होत आहे.
यावर एक उत्तम पर्याय म्हणजे “पुनरुत्पादक शेती”(Regenerative agriculture) ज्यालाच “कार्बन फार्मिंग” अथवा ‘निसर्गासारखी शेती’ असेही म्हंटले जाते.
कार्बन फार्मिंग मध्ये वातावरणात असलेला कार्बन वेगवेगळ्या प्रक्रियांद्वारे पुन्हा जमिनीमध्ये मिसळा जातो.
कार्बन फार्मिंग कशी केली जाते?
यामध्ये मातीला केंद्रस्थानी ठेवून सर्व प्रक्रिया केल्या जातात. माती पुनर्संचयित करून, जैवविविधता वाढवून आणि वातावरणातील कार्बन कमी करून हवामानातील बदलांना मागे टाकत अन्न सुरक्षेला प्रोत्साहन देण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे.
अमेरिकेतील पुनरुत्पादक शेतीचे अभ्यासक गाढे गेब ब्राउन लिखित ‘Dirt To Soil’ या पुस्तकानुसार पुनरुत्पादक शेती ही ५ मुख्य तत्वांवर अवलंबून आहे.

१. मातीतील मानवीकृत हालचाली कमी करणे-
जंगलामध्ये वेगवेगळ्या वनस्पती कोणत्याही मशागत किंवा रासायनिक खत आणि किटकनाशक न वापरता वाढतात. अगदी तसेच येथे शेतात पीक घेत असताना “झिरो टिलेज” (Zero tillage) ही संकल्पना वापरली पाहिजे. मशागत केल्यामुळे माती पीक लागवडीसाठी तयार नक्कीच होत असते, परंतु यामुळे मातीत असणाऱ्या जैविक घटक ऱ्हास पावतात. कमीत कमी किंवा मशागत न करता पीक उत्पादनावर भर द्यायला हवा.
2.पिकाचा वापर करून मातीची धूप कमी करणे-
एकदा पीक कापणी झाल्यानंतर माती जशी आहे तशी तापवण्यासाठी ठेवली जाते, ज्यामुळे वारा आणि पाण्याने मातीची धूप होण्याची शक्यता वाढते. ही धूप रोखण्यासाठी माती वर्षभर वेगवेगळ्या वनस्पतींनी झाकून ठेवावी. ह्या वनस्पती हवेतील कार्बनचे रूपांतर कार्बनडायऑक्साइड (CO2) च्या स्वरूपात शोषून घेत प्रकाशसंश्लेषण (PHOTOSYNTHESIS) प्रक्रियेत त्याचा वापर करतील.
3.विविध पिकांची एकत्रित लागवड- वर्षानुवर्षं एकाच प्रकारची पिक लागवड केल्यामुळे माती मध्ये असणाऱ्या ठराविक मूलद्रव्ये कमी होतात परिणामी ते पुन्हा पिकास उपलब्ध करून देण्यासाठी रासायनिक खतांचा वापर केला जातो. वेगवेगळ्या गटातील पिकांची लागवड जसे की, तृणधान्याबरोबर कडधान्याची लागवड केल्याने ही मूलद्रव्यांची गरज पिकानुसार बदलत जाते ज्यामुळे त्यांचे मातीतील योग्य प्रमाण राखण्यास व वाढविण्यास मदत होते.
4.मुळे जिवंत राखणे- प्रकाशसंश्लेषण (PHOTOSYNTHESIS) प्रक्रियेद्वारे मिळवलेला कार्बन मुळांद्वारे जमिनीत वाहून नेला जातो. पिकांनी जमिनीत एकत्रित केलेला हा कार्बन आणि साठवलेले इतर पोषक घटक मातीत असणारे सूक्ष्मजीव त्यांच्या वाढीसाठी वापरतात. त्या बदल्यात ते माती भुसभूशीत करून मातीचे आरोग्य राखण्यास मदत करतात ज्यातून मुळांची वाढ आणि मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढण्यास मदत होते.
5.शेतीमध्ये पशुपालनाचा समावेश-
पशुपालनाचे अनेक फायदे आहेत. या प्राण्यांनी अन्न पचनानंतर बाहेर टाकलेले शेण आणि मूत्र विविध प्रकारच्या खताचा चांगला स्रोत म्हणून पिकांसाठी फायद्याचे ठरतात. मातीची सुपीकता वाढवणे आणि टिकवून ठेवणे, पोषक तत्वे पुरवणे, मातीतील सेंद्रिय पदार्थ वाढवणे, केटायन एक्सचेंज (CEC) आणि पीएच (pH), मातीचे भौतिक गुणधर्म जसे की पाणी धरून ठेवण्याची क्षमता (WHC) सुधारणे या सर्वांचे जनावरांचे खत हे प्रमुख स्त्रोत आहे.
माती ही पृथ्वीची कातडी आहे जी सूक्ष्मजंतूंद्वारे तयार केली जातो. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. त्यामुळे या पृथ्वीला नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी “पुनरुत्पादक शेती” (Regenerative agriculture) म्हणजेच कार्बन फार्मिंग हा एक चांगला पर्याय असू शकतो