भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जर्मनी मधील स्क्लॉस एल्माऊ येथे G7 परिषदेसाठी गेले होते. तेथे पंतप्रधानानी जगाला संबोधित केले आणि इतर प्रगत राष्ट्रांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका देखील घेतल्या.
काय आहे G7?
G7 हा शक्तिशाली विकसित राष्ट्रांचा आंतरशासकीय गट आहे. G7 गटाची स्थापना चार दशकांपूर्वी १९७५ मध्ये झाली आहे.
गटाला G7 नाव का पडले?
G7 अर्थात ‘Group of seven’ हा अमेरिका (USA), इंग्लंड, जपान, फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा आणि युरोपियन युनियन या ७ महासत्ता असलेल्या राष्ट्रांनी एकत्र येऊन जागतिक आर्थिक प्रश्न, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, ऊर्जासुरक्षा, शस्त्रास्त्र नियमन, दहशतवाद सारख्या जगाच्या पाठीवरील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी उभारलेला मंच आहे.
G7 स्थापनेपासून इतिहास :
१९७५ मध्ये फ्रान्स, इटली, जपान, पश्चिम जर्मनी, युनायटेड किंग्डम, यु.एस.ए. या सहा कम्युनिस्ट विरोधी विचारधारा असलेल्या लोकशाही राष्ट्रांनी एकत्र येत जागतिक अर्थव्यवस्थेमधील वाढती महागाई आणि मंदीवर उपाय शोधण्याकरिता G6 हा गट स्थापन केला.
१९७६ मध्ये कॅनडा देश या गटात सामील झाल्याने या गटाला G7 नाव पडले.
१९९८ मध्ये रशिया ने ह्या गटात स्थान मिळवले परंतु २०१४ मध्ये रशिया ने क्रिमिया वर आक्रमण केल्याने इतर नाराज सदस्यांनी रशियाची या गटातून हकालपट्टी केली.
G7 आकडेवारी मधून :
१. जगाच्या १०% लोकसंख्या
२. जगाच्या ३१% GDP
३. जगाच्या २१% कार्बन उत्सर्जन
भारताला प्रथमच निमंत्रण होते का?
नाही. भारताला आतापर्यंत वेळोवेळी G7 परिषदेमध्ये आमंत्रण दिले गेले आहे. याअगोदर भारताचा शस्त्रास्त्र पुरवठादार देश फ्रान्स ने देखील निमंत्रण दिले होते.
२०२१ मध्ये युनायटेड किंग्डम ने भारताला विशेष आमंत्रण दिले होते तर २०२२ मध्ये देखील जर्मनीचे चान्सेलर ओलाफ स्कॉल्ज यांनी G7 शिखर परिषदेत ‘Partner country’ म्हणून भारताला विशेष निमंत्रण दिले. यावरून भारताची जागतिक स्तरावरील प्रतिमा उंचावली गेली असल्याचे चटकन् लक्षात येते!
भारतासाठी G7 मधील निमंत्रण का महत्वाचे?
भारताच्या जागतिक महासत्ता बनण्याच्या मार्गावरील हा मैलाचा दगड ठरणार आहे. ही राष्ट्रे G7 गटामध्ये भारताला सामील करण्याच्या विचाराधीन आहेत.
या गटात सामील होणे म्हणजे भारताचा वाढता भुराजनयिक दबदबा आणि आंतरराष्ट्रीय प्रभाव यांचा हा पुरावा आहे.
हिंदी महासागरातील वाढत्या चिनी अतिक्रमनांना तोंड देण्यासाठी आणि सामरिक क्षमता वाढविण्यासाठी भारताला हा गट प्रभावशाली बनवेल.