११ जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे लोकांना वाढत्या जागतिक लोकसंख्येची जाणीव करून देणे, जी खरोखरच खूप चिंताजनक बाब आहे. ११ जुलै १९८७ रोजी जगाच्या लोकसंख्येने पाच अब्जांचा टप्पा गाठला आणि तेव्हापासून हा दिवस जनजागृतीसाठी साजरा केला जातो.
जागतिक लोकसंख्या २०२२ मध्ये ८ अब्ज पेक्षा अधिक आहे. जागतिक लोकसंख्या दिवस २०२२ ची थीम आहे: “८ अब्जांचे जग: सर्वांसाठी एक लवचिक भविष्याकडे – संधींचा उपयोग आणि सर्वांसाठी हक्क आणि निवडी सुनिश्चित करणे”.
जागतिक लोकसंख्या ८ कोटी असताना अनेक प्रश्न जगासमोर उभे आहेत. मानवामध्ये भौतिक असमानता, समान हक्क, संधीचा अभाव, निवड स्वातंत्र्य नाकारले जाणे अशा बऱ्याच समस्याविषयी जागरूकता निर्माण केली जाणार आहे.

भारताविषयी आकडेवारी:
भारत लोकसंख्येच्या तुलनेत जगात चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या भारताची लोकसंख्या १४० कोटी असल्याचे समजते. भारताची लोकसंख्या जरी प्रचंड असली तरी भारताचा लोकसंख्यावाढीचा दर कमी आहे.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालानुसार भारत चीनला लोकसंख्येमध्ये २०२३ मध्ये मागे टाकेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारतीय आकडेवारीच्या अंदाजाची तुलना करता १३ वर्षे अगोदर चीनला भारत मागे टाकेल. यानंतर भारत जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल. भारताची लोकसंख्या घनता देखील ३६२ पेक्षा अधिक आहे. सद्यस्थितीत भारताचा प्रजनन दर २.० आहे, म्हणजेच सध्या एक दाम्पत्य २ मुलांना जन्माला घालते.

चिंताजनक बाबी :
२०११ च्या जनगणनेनुसार भारतात लिंग गुणोत्तर प्रमाण चिंताजनक स्थितीमध्ये आहे. भारतामध्ये दर १००० मुलांमागे ९४३ मुली आहेत. यामध्ये १००० मुलांमागे ग्रामीण भागात ९४९ तर शहरात ९२९ मुली आहेत.
भारताची लोकसंख्या जगात सर्वाधिक होणार असल्याने एवढ्या मोठ्या जनतेला सामाजिक सुरक्षा, रोजगारनिर्मिती, अन्नसुरक्षा, आरोग्यसुविधा, पायाभूत सुविधा निर्मिती, कायदा आणि सुव्यवस्था राखणे असे अनेक किचकट प्रश्न भारतासमोर उभे आहेत. परिणामी भारतातील उच्चशिक्षित मुलांचे भारतामधील अपुऱ्या संधी, भ्रष्टाचार, परदेशाची ओढ, परकीय संस्कृतीचे आकर्षण अशा अनेक कारणांमुळे स्थलांतर (Brain Drain) होताना आढळते.
वाढत्या लोकसंख्येचे नियंत्रण कसे करता येईल?
एका म्हणीनुसार “तुम्ही एका पुरुषाला शिकवाल तर तो पुरुष साक्षर होईल, पण तुम्ही एका स्त्रीला शिकवाल ती संपूर्ण पिढी साक्षर होईल.” महिलांची लोकसंख्या विषयी जागृती करणे गरजेचे आहे. याचबरोबर ‘कुटुंबनियोजन’ हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरतो. गर्भनिरोधक वापराविषयी आजही तुलनात्मकदृष्ट्या जागृती कमी आढळते. एकूण ‘साक्षरता’ वाढ झाल्यावर शैक्षणिक अध्ययनातून वर्तणूक बदल घडून येईल.